महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच सुनेत्रा पवार यांच्या खात्यांचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारतानाच त्यांच्याकडे तीन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली असली, तरी अजित पवारांकडील सर्वात प्रभावी मानले जाणारे ‘अर्थ आणि नियोजन’ खाते मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क खाते महसुलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तर क्रीडा व युवक कल्याण खात्याच्या माध्यमातून राज्यातील तरुणाईपर्यंत पोहोचण्याची संधी त्यांना मिळणार आहे. अल्पसंख्याक विकास खात्यामुळे सामाजिक समतोल साधण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर येणार आहे.
दरम्यान, ‘अर्थ आणि नियोजन’ खाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवण्यामागे महत्त्वाचे कारण समोर आले आहे. आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळ आले असून, 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी मोठी आहे. सुनेत्रा पवार यांना प्रशासकीय व अर्थसंकल्पीय अनुभव नसल्यामुळे ऐन अधिवेशनाच्या तोंडावर कोणताही धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
या खातेवाटपामुळे राज्यातील राजकीय समीकरणे आणखी तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.









