आई होण्याच्या स्वप्नांनी डोळे भरून आलेल्या एका मातेच्या आयुष्यात काळाने असा घाव घातला की, तिच्या कुशीत येण्याआधीच चिमुकल्याचा श्वास कायमचा थांबला. प्रसूती वेदनांनी तडफडणाऱ्या आईला वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही आणि एका निष्पाप जीवाला या जगाचा प्रकाश पाहण्याआधीच निरोप घ्यावा लागला. हिंगोली जिल्ह्यातील नालेगाव येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून, आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे आरोग्य व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा काळीज पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या गरोदर महिलेला वेळेत शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेर नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला असून आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
नालेगाव येथील मनिषा इंगळे या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. मंगळवारी अचानक त्यांना तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी जीव धोक्यात घालून त्यांना दुचाकीवरून तब्बल पाच किलोमीटर अंतर पार करत जवळाबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. वेदनांनी तडफडणाऱ्या महिलेला रस्त्यातून नेताना कुटुंबीयांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता.
प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र १०२ आणि १०८ या आपत्कालीन सेवांवर वारंवार संपर्क साधूनही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. काही ठिकाणी डिझेल नसल्याचे, तर प्रशासनाकडून चालक उपलब्ध नसल्याचे कारण सांगण्यात आले.
अखेर खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने महिलेला हिंगोली येथे हलविण्यात आले. मात्र उशीर झाल्याने सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर नवजात बालक मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
“एका निष्पाप जीवाचा मृत्यू नेमका कोणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?” असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था आणि रुग्णवाहिका सेवेचा बोजवारा पुन्हा एकदा या घटनेमुळे समोर आला आहे.







Leave a Comment