पावसाळा सुरू झाला की सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवाईने न्हाऊन निघतात. धबधबे खळाळतात, डोंगरांवर हिरवा गालिचा पसरतो आणि निसर्गप्रेमी पर्यटकांची पावले सातपुड्याकडे वळतात. मात्र, याच निसर्गरम्य सातपुड्याची ओळख आता हळूहळू ‘दारूच्या बैठकांचे ठिकाण’ म्हणून होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
अकोट तालुक्याच्या जवळ असलेल्या सातपुडा परिसरात पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कुटुंबांसह निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसोबतच काही जण मित्रांच्या टोळक्याने जंगल परिसरात बसून मद्यपान करत असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याची तक्रार आहे.
हातात दारूच्या बाटल्या, समोर निसर्गाचा नजारा आणि पार्टीचा माहोल… असा प्रकार वाढत गेला तर पर्यटनस्थळाचे रूपांतर मद्यपानाच्या अड्ड्यात होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
दारू संपते; बाटल्या मात्र जंगलातच!
मद्यपानानंतर दारू-बिअरच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, वेफर्सची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या जंगलातच फेकल्या जात असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे सातपुड्याच्या स्वच्छ, सुंदर आणि नैसर्गिक वातावरणाला कचऱ्याचा विळखा पडत आहे.
फुटलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्यता आहे. प्लास्टिकचा कचरा वन्यजीवांच्या अधिवासासाठीही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पर्यटनाच्या नावाखाली निसर्गाची नासधूस करणाऱ्यांवर नियंत्रण कोण ठेवणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे
पोपटखेड गेटवर तपासणी कडक करण्याची गरज
सातपुड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील पोपटखेड वनविभाग तपासणी नाक्यावर पर्यटक आणि वाहनांची तपासणी अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. वनक्षेत्रात मद्य घेऊन जाणे, मद्यपान करणे किंवा कचरा टाकणे यासारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमित तपासणी आणि गस्त वाढवणे आवश्यक आहे.
‘सातपुडा पर्यटनासाठी आहे, दारूच्या बैठकांसाठी नाही!’ असा स्पष्ट संदेश वनविभागाने देण्याची वेळ आली आहे.
निसर्ग वाचवायचा असेल तर कारवाईही हवी!
सातपुड्याचे सौंदर्य पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढत आहे. ही पर्यटनाच्या दृष्टीने चांगली बाब असली तरी पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबत नियमांची अंमलबजावणीही तितकीच कडक असणे गरजेचे आहे.
मद्यपान करणाऱ्यांवर, जंगलात कचरा फेकणाऱ्यांवर आणि वनक्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वनविभागाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.सातपुड्याच्या कुशीत धबधबे खळाळावेत, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यावा आणि हिरवाईचा आनंद पर्यटकांनी घ्यावा; दारूच्या बाटल्यांचा खणखणाट आणि पार्टीचा धिंगाणा नको!
सातपुडा निसर्गप्रेमींच्या पर्यटनाचा राहणार, की दारूच्या बैठकांचा?
याचे उत्तर केवळ पर्यटकांनी नाही, तर वनविभागाच्या कठोर कारवाईनेही द्यावे लागणार आहे.






Leave a Comment