अकोला | प्रतिनिधी अकोल्यातील भारतीय सैन्यातील जवान सुशील दिलीप तेलगोटे यांच्या हत्येप्रकरणात महत्त्वपूर्ण न्यायालयीन घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे याला मंजूर करण्यात आलेला जामीन न्यायालयाने रद्द करत त्याला तात्काळ अटक करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
२४ मार्च २०२६ रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोली बु. मार्गावर सुट्टीसाठी घरी आलेल्या जवान सुशील तेलगोटे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी यशवंतसिंह उर्फ गोल्या गणेश ठाकूर, जय विनोद मुरेकर, निलेश उर्फ बाला धुमाजी सोलापूरे आणि अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे या आरोपींना अटक केली होती.
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपी अंकित खंडारे याला जामीन मंजूर झाला होता. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर आरोपीकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप मृत जवानाच्या वडिलांनी केला. याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनासह संबंधित न्यायालयाकडे तक्रार करून आरोपीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.
प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने मृत जवानाच्या वडिलांनी ॲड. नजीब शेख यांच्यामार्फत बीएनएस कलम ३८३(३) अंतर्गत न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान शहर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनीही आरोपीचा जामीन रद्द करण्याची भूमिका मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तृतीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तेजवंतसिंह संधू यांनी आरोपी अंकित उर्फ छोटू विठ्ठल खंडारे याचा जामीन रद्द करून त्याला पुन्हा अटक करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या या निर्णयाचे मृत जवानाच्या कुटुंबीयांनी तसेच महार रेजिमेंटमधील जवानांनी स्वागत केले आहे. या प्रकरणात ॲड. नजीब शेख यांना ॲड. सोहराब आणि शिबा मलिक यांचे सहकार्य लाभले. न्यायालयाने हत्या प्रकरणातील आरोपीचा मंजूर झालेला जामीन रद्द केल्याची ही अकोला जिल्ह्यातील दुर्मिळ न्यायालयीन घटना मानली जात आहे.






Leave a Comment