अकोला | प्रतिनिधी निकृष्ट दर्जाच्या आणि बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर ९ बियाणे कंपन्यांविरुद्ध १० ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी उगवणच झाली नाही. त्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत असून, पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि जिल्हा कृषी अधिकारी यांनी जिल्हाभरातील तक्रारींची चौकशी करून दोषी कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. एका कंपनीविरुद्ध दोन ठिकाणी गुन्हा दाखल झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गुन्हे दाखल झालेल्या कंपन्या
ओसवाल सीड्स – मूर्तिजापूर
विगर सीड्स – तेल्हारा
ईगल सीड्स – बाळापूर
ASSURE सीड्स – अकोला
इनोवेज (पार्श्व जेनेटिक) सीड्स – पातूर
ग्रीन गोल्ड सीड्स – तेल्हारा
दफ्तरी सीड्स – तेल्हारा
अंकुर सीड्स – बार्शीटाकळी
बाफना सीड्स – बार्शीटाकळी
ईगल सीड्स – अकोट (त्याच कंपनीविरुद्ध दुसऱ्या ठिकाणीही गुन्हा)
निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळणार का आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत.
दरम्यान, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई सुरू ठेवली असून, दोषी कंपन्यांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबविण्यात येत असल्याचे सांगितले आहे.






Leave a Comment