Ads

विहिरीत सापडले पाच मृतदेह; चार चिमुकल्यांना घेऊन वडिलांनी संपवलं आयुष्य, बुलढाणा हादरलं

By Nilesh Sir

May 25, 2026 4:55 pm

Ads

आईच्या कुशीत खेळण्याच्या वयातील चार निष्पाप चिमुकल्यांचा मृत्यू आणि त्यानंतर वडिलांनीही जीवन संपवल्याच्या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा बुद्रुक शिवारात एका विहिरीत एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विजय मुसा किरडिया यांनी आपल्या दोन मुली आणि दोन मुलांना विहिरीत ढकलल्यानंतर स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मृत मुलांचे वय अवघे दोन ते आठ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे विजय किरडिया यांनी पत्नीला एक दिवस आधीच माहेरी सोडून आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आज सकाळी राजुरा बुद्रुक शिवारातील विहिरीत पाचही मृतदेह आढळून आले. ही घटना समोर येताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

या हृदयद्रावक घटनेने बुलढाणा जिल्हा हादरला असून, सर्वत्र दुःख आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!