अकोट तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आकोट ते राहणापुर बस सेवा नियमित सुरू करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आकोट यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोट आगार प्रमुखांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राहणापुर, कासोद, शिवपुर आणि बोर्डी या आदिवासी बहुल गावांतील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज आकोट आणि बोर्डी येथे ये-जा करतात. मात्र या भागात राज्य परिवहन मंडळाच्या बस सेवेशिवाय दुसरा कोणताही प्रवासाचा पर्याय उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः आकोट ते राहणापुर बस सेवा अनियमित असल्याने विद्यार्थ्यांचा वेळ व आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून अकोट आगारातून दररोज सकाळी १० वाजता आणि दुपारी ५ वाजता राहणापुर मार्गावर बसफेऱ्या नियमित सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केली आहे.
या मागणीमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आता परिवहन महामंडळ प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment