अकोला शहरात जनावर चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात जुने शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत जनावर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल १० जनावर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस स्टेशन जुने शहर येथे अब्दुल रफीक अब्दुल सत्तार (वय ६८, रा. खरप रोड, वाशिम बायपास, अकोला) यांनी १७ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरासमोर बांधलेली पांढऱ्या रंगाची जर्सी गाय १४ एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा क्रमांक ५६२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी सापळा रचून तौसीफ शाह सकाउल्ला शाह (वय २२, रा. पाचमोरी कानडी), अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. हैदरपुरा, सिंधी कॅम्प खदान) आणि तनवीर खान आसीफ खान (वय २५, रा. शहर किल्ला जवळ, बाळापूर) यांना अटक केली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली टाटा कंपनीची ZEST EX ग्रे रंगाची MH 43 BG 3251 क्रमांकाची कार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयातून आरोपींची पोलीस कोठडी मिळवून कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपींनी चिखलगाव, म्हातोडी, उगवा, बंधुकोटा, निंबी मालोकार, कापसी तलाव, हिंगणा तामसवाडी आणि धनेगाव बाळापूर परिसरातून ८ बैल, ७ गोरे आणि ४ गायी अशी एकूण १९ जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरीस गेलेल्या जनावरांची अंदाजे किंमत ५ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात शोएब बेग अजहर बेग (रा. अकोट फाईल), राजीक कुरेशी आणि शेख वकील शेख शकील (दोघे रा. वाडेगाव) यांचाही सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. जनावर चोरीच्या मालिकेचा उलगडा झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.







Leave a Comment