Ads

आजाराच्या वेदनांनी अखेर जीवन हरवलं!72 वर्षीय वृद्धाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

By Nilesh Sir

May 15, 2026 9:51 am

Ads

जगण्याची इच्छा संपली नव्हती…पण शरीराने साथ सोडली होती. दररोज आजाराशी झुंज देणारा एक वृद्ध अखेर वेदनांना कंटाळला आणि शांतपणे मृत्यूच्या दिशेने निघून गेला. तेल्हारा शहरातील बजरंग चौक परिसरात राहणारे किसन सिताराम सोळंके वय 72 वर्षे यांनी सततच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास किसन सोळंके हे नेहमीप्रमाणे घराबाहेर फिरण्यासाठी गेले होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. सकाळी पत्नी पुष्पा सोळंके यांच्यासोबत घरातील नित्याची कामे उरकल्यानंतर ते बाहेर पडले. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत.

दरम्यान, तेल्हारा शेतशिवारातील बी. एन. वानखडे यांच्या शेतात काशीदच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले. नातेवाईकांनी ही माहिती कुटुंबीयांना दिल्यानंतर एकच खळबळ उडाली.

सततच्या आजारपणामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास वाढल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणारा माणूस अखेर वेदनांसमोर हरल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी पत्नी पुष्पा किसन सोळंके यांनी तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेल्हारा ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गजानन उर्फ राजू इंगळे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, वाढत्या आजारपणामुळे आणि मानसिक तणावामुळे वृद्धांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे चित्र समोर येत असून, अशा घटनांनी समाजमनही सुन्न होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!