महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून 65 वर्षीय हरिदास पांडुरंग वानरे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना बाळापूर तालुक्यातील व्याळा पेठ येथे घडली असून, सुशिक्षित समाजातही अंधश्रद्धेची मुळे किती खोलवर रुजली आहेत, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत हरिदास वानरे यांच्या पत्नी रुख्मिना वानरे (60) यांनी बाळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 13 मे रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी सुधाकर गाडगे हा हातात लाकडी दांडके घेऊन वानरे यांच्या घरी पोहोचला. घरासमोर येताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि जबरदस्तीने घरात प्रवेश केला.
“तुझ्या जादूटोण्यामुळे माझ्या पत्नीचे आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले,” असा आरोप करत आरोपीने संतापाच्या भरात हरिदास वानरे यांच्यावर हल्ला चढवला. त्याने लाकडी दांड्याने हरिदास यांच्या डोक्यावर जोरदार वार केले. हल्ला इतका भीषण होता की, गंभीर दुखापतीमुळे हरिदास वानरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे व्याळा पेठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 333 आणि 103(1)(3) अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर आरोपी सुधाकर गाडगे फरार झाला होता. मात्र बाळापूर पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत त्याला ताब्यात घेतले. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी दिली.
दरम्यान, अंधश्रद्धेमुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्याने सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अजूनही जादूटोणा, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंसक घटना घडत असल्याने समाजप्रबोधनाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
ही घटना केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागात अंधश्रद्धेविरोधात अधिक प्रभावी जनजागृती मोहिमा राबवण्याची आवश्यकता स्पष्ट करणारी आहे. प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.







Leave a Comment