मुर्तिजापूर शहरात पोलिसांच्या ताब्यातून गंभीर गुन्ह्यांतील आरोपी फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चोरी, अपघात, रेल्वे कायदा आणि इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला विजय मधुकर रोडे याने थेट पोलिसांच्या ताब्यातून पळ काढल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मधुकर रोडे (वय २५, रा. धोत्रा शिंदे ता. मुर्तिजापूर) याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. न्यायालयाच्या रिमांड वॉरंटनुसार त्याला अकोला कारागृहात दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचारी घेऊन जात होते. मात्र दिनांक ७ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास मुर्तिजापूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आरोपीने अचानक पोलीस कर्मचारी पवन बोचरे यांच्या हाताला जोराचा झटका देत थेट पोलिसांच्या कायदेशीर ताब्यातून पळ काढला.
या घटनेनंतर पोलिस विभागात एकच धावपळ उडाली. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी पुन्हा एखादा गंभीर गुन्हा करू नये यासाठी पोलिसांकडून कसून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल साहील मुलानी यांच्या फिर्यादीवरून मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वानखडे करीत आहेत.
दरम्यान, “गंभीर गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांच्या ताब्यातूनच फरार होतो कसा?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







Leave a Comment