“आता मुलींना घरात ठेवायचं तरी कुणाच्या भरोशावर?”हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक आई-वडिलांच्या मनात धगधगत आहे. नसरापूरमधील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येची जखम अजून ताजी असतानाच पुणे शहर पुन्हा एका संतापजनक घटनेने हादरलं आहे. यावेळी तर नात्यालाच काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका ७० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या ९ वर्षीय नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी थेट पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई मजुरीचे काम करत असल्याने मुलीला आजोबांकडे ठेवण्यात आले होते. पण ज्या व्यक्तीकडे संरक्षणाची अपेक्षा होती, त्याच व्यक्तीने त्या निष्पाप मुलीच्या आयुष्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला.
आरोपीचे नाव अंबादास यल्लाप्पा जाधव (वय ७०) असे असून त्याने मुलीचे कपडे काढून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुदैवाने परिसरातील काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती देताना पर्वती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितले की, रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपीला नागरिकांनी पकडून ठेवल्याची माहिती मिळाली होती. आरोपी हा पीडित मुलीचा सख्खा आजोबा असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला. “अशा नराधमाला कायद्याने नव्हे तर जनतेसमोर शिक्षा व्हायला हवी,” अशा भावना नागरिक व्यक्त करत होते. पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमली होती.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अकोला जिल्ह्यातील पातूरमध्येही अशाच प्रकाराने संताप उसळला होता. आणि आता पर्वतीत पुन्हा अशीच घटना घडल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
“मुलींना सुरक्षित कोण ठेवणार?”
“नात्यांवरचा विश्वासच संपत चाललाय का?”
असे संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
महिलांवरील आणि लहान मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे समाजमन हादरून गेले आहे. कायदे कठोर असले तरी अशा नराधमांची मानसिकता अजूनही संपलेली नाही, हीच खरी शोकांतिका आहे.







Leave a Comment