“तुम्ही खाताय ते सुरक्षित आहे का?” — अकोल्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने नागरिकांच्या आरोग्याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. रस्त्यावर मिळणारा स्वस्त आणि चविष्ट नाश्ता खरेच सुरक्षित आहे का, यावर आता गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील धीग्रा चौक बसस्थानक परिसरात पहाटेच्या नाश्त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. येथे पोहे, समोसा, कचोरी यांसारख्या पदार्थांच्या हातगाड्या लावल्या जातात. मात्र, याच ठिकाणी नाल्याच्या पाण्याचा वापर करून नाश्ता तयार केला जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती नाल्याच्या पाण्याचा वापर करत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा अस्वच्छ पद्धतीने बनवलेले अन्न सेवन केल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो.
यापूर्वी मुंबईतील विरार येथे मास्यांवर मच्छर मारण्याचा स्प्रे फवारल्याचा प्रकार समोर आला होता. आता अकोल्यातील ही घटना पुन्हा एकदा खाद्यसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणत आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि महानगरपालिका यांनी तत्काळ दखल घेऊन अशा बेकायदेशीर आणि अस्वच्छ व्यवसायांवर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
अकोल्यातील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “आपण जे खातोय ते खरंच सुरक्षित आहे का?” हा सवाल आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे.







Leave a Comment