अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल अंतर्गत चोहोट्टा बाजार येथील वीटभट्टी प्रकरण दिवसेंदिवस अधिकच चिघळत असून, कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर येत आहेत. महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी थेट “सिस्टम मॅनेज झाली का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अकोल्यात खाण व्यावसायिकांकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे. विशेष म्हणजे, हेच अधिकारी चोहोट्टा बाजार येथे कारवाईसाठी आले होते, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकशीचे आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कारवाई मात्र ‘थातूर-मातूर’ स्वरूपाची असल्याचा आरोप होत आहे. काही वीटभट्टी चालकांना मुदतवाढ देण्यात येत असताना, काहींवर कठोर कारवाई केली जात असल्याने दंड वसुलीत दुजाभाव असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, हे प्रकरण केवळ भ्रष्टाचाराचे नसून प्रशासनातील संगनमताचे संकेत देणारे आहे. “नियम सर्वांसाठी समान असताना निवडक लोकांनाच सवलत का?” असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. अन्यथा जिल्हा प्रशासनावरील विश्वास आणखी ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चोहोट्टा बाजार वीटभट्टी प्रकरण आता केवळ स्थानिक मुद्दा राहिला नसून, प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. आता या प्रकरणात खरी कारवाई होते की पुन्हा एकदा “सिस्टम मॅनेज” होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment