अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो प्रतिनिधी :-मुंडगाव-तेल्हारा रोडवर सध्या भर उन्हाळ्यात सुरू असलेल्या वृक्षलागवडीच्या कामामुळे कंत्राटदार आणि प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एप्रिलच्या कडक उन्हात झाडे लावण्याचा निर्णय नेमका कोणत्या तर्कावर घेतला गेला, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
सामान्यतः वृक्षलागवडीसाठी पावसाळा हा सर्वोत्तम हंगाम मानला जातो. मात्र, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून उन्हाळ्यात घाईघाईने सुरू केलेले हे काम केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठीच तर नाही ना, अशी चर्चा परिसरात रंगत आहे.

झाडे लावणे ही निश्चितच सकारात्मक बाब असली तरी त्यांची योग्य निगा राखणे अत्यावश्यक असते. सध्या मात्र या झाडांसाठी ना पाण्याची ठोस व्यवस्था दिसते, ना संरक्षणाची कोणतीही योजना. त्यामुळे काही दिवसांतच ही रोपे वाळण्याची शक्यता व्यक्त होत असून, सरकारी निधी वाया जाणार का, अशी चिंता नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिकांच्या मते, हे काम केवळ कंत्राट पूर्ण करण्यासाठी आणि बिल काढण्यासाठी केले जात आहे. प्रत्यक्षात पर्यावरण संवर्धनाचा कोणताही ठोस विचार या मागे दिसून येत नाही. प्रशासनानेही या कामाकडे डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे.
“उन्हाळ्यात झाडे लावून त्यांना मरायला सोडणे, ही पर्यावरणाशी थट्टा नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा अशा दिखाऊ कामांमुळे केवळ सरकारी निधीचा अपव्यय होणार असून पर्यावरणाचे नुकसान होणार, हे निश्चित आहे.
मुंडगाव-तेल्हारा रोडवरील ही वृक्षलागवड योजना खरोखरच हरित उपक्रम आहे की केवळ कागदोपत्री आकडे वाढवण्याचा खेळ, याचे उत्तर आता प्रशासनालाच द्यावे लागणार आहे.







Leave a Comment