Ads

नांदेडमध्ये रक्तरंजित गँगवॉर! एकाच रात्रीत तिहेरी हत्या

By Nilesh Sir

April 4, 2026 2:13 pm

Ads

नांदेड शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाच्या वादातून शुक्रवारी मध्यरात्री भीषण गँगवॉर उसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅनाल रोडवरील डी-मार्ट परिसरात झालेल्या या रक्तरंजित संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गँगवॉरमध्ये अर्जित सिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ या तिघांची हत्या झाली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अर्जित सिंग हा ‘सदा गँग’चा प्रमुख होता, तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेझ हे ‘साई लाला’ गँगचे शूटर होते. दोन्ही टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्ववादावरून संघर्ष सुरू होता.

घटनेच्या दिवशी अर्जित सिंग चव्हाण हा आपल्या मित्रासोबत बुलेटवरून डी-मार्ट परिसरातून जात असताना अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अर्जितच्या साथीदारांनी तात्काळ प्रतिहल्ला करत मोहम्मद अरबाजवर चाकू आणि खंजीरने वार केले, ज्यामध्ये त्याचाही मृत्यू झाला.

या दोन हत्यांनंतरही हिंसाचार थांबला नाही. अर्जितच्या भावाने रुग्णालयात दाखल असलेल्या सय्यद आवेझवर हल्ला करून त्याचा खून केला. एकाच रात्रीत झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे पोलीस यंत्रणा हादरली आहे.

भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ कारवाई करत आतापर्यंत ७ ते ८ संशयितांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या घटनेत दोन्ही गँगचे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या गँगवॉरमागील मूळ कारण काय, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. मात्र भरवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली असून पोलिसांनी कडक कारवाईची ग्वाही दिली आहे.


No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!