अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो अकोला :-चोहोट्टा बाजार येथील 33 केव्ही महावितरण केंद्राच्या अंतर्गत भागात अवकाळी पावसाने अक्षरशः महावितरणच्या कारभाराची पोलखोल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाऱ्यासह पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून “वारा आला की बत्ती गुल, रात्रभर अंधार” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भर उन्हाळ्यात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लहानसा वारा जरी आला तरी तासन्तास वीज गायब होते, त्यामुळे घरगुती कामे, पाणीपुरवठा आणि व्यावसायिक व्यवहार ठप्प होत आहेत.
विशेष म्हणजे, स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेताना ग्राहकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली वीजपुरवठा अधिक स्थिर होईल, असा दावा करणाऱ्या महावितरणचे वास्तव मात्र याच्या पूर्णपणे उलट दिसत आहे. स्मार्ट मीटर बसवूनही नागरिकांना कोणताही फायदा होत नसून, उलट समस्या अधिक वाढल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून, “महावितरणला केवळ बिल वसुली महत्त्वाची, सेवा देण्याची जबाबदारी नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
वीजपुरवठा खंडित होण्यामागे जुनाट यंत्रणा, अपुरी देखभाल आणि नियोजनाचा अभाव ही प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे. अवकाळी पावसासारख्या साध्या नैसर्गिक परिस्थितीतही व्यवस्था कोलमडत असेल, तर मोठ्या संकटाच्या वेळी काय होणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून, वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. महावितरण प्रशासनाने तातडीने दुरुस्ती, देखभाल आणि सक्षम यंत्रणा उभारून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे, अन्यथा हा संताप उग्र रूप धारण करू शकतो.







Leave a Comment