वाशिम तालुक्यातील अडोळी गावात शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आणि धक्कादायक आंदोलन छेडले असून, “गाव विकत घ्या आणि आम्हाला कर्जमुक्त करा” अशी थेट मागणी शासनाकडे केली आहे. गुरुवार (दि. २) पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या ठिय्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून, या आंदोलनाची राज्यभर चर्चा रंगली आहे.
गेल्या काही वर्षांपासून सततची नापिकी, अतिवृष्टी, उत्पादन खर्चात झालेली प्रचंड वाढ आणि कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने वेळेत दखल न घेतल्यामुळेच हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे आंदोलनकर्ते सांगत आहेत.
या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आणि ठाम आहेत. सरसकट कर्जमाफी लागू करावी, वाशिम जिल्ह्यासाठी पीकविमा योजना प्रभावीपणे राबवावी, खाजगी फायनान्स कंपन्यांकडून सुरू असलेली कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि जिल्ह्यात एमआयडीसी प्रकल्प उभारून रोजगारनिर्मिती करावी, अशा मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफी जाहीर करताना केवळ दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनाच मर्यादित दिलासा देण्यात आला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.
याशिवाय, कर्जमाफीसाठी विविध अटी आणि निकष लावण्याचे संकेत मिळत असल्याने संताप अधिकच वाढला आहे. त्यामुळे कोणत्याही अटी-शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी लागू करण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
या आंदोलनामुळे शासन आणि प्रशासनावर दबाव वाढला असून, आता सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment