देशात एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा मिळावा आणि काळाबाजार रोखता यावा यासाठी १ एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
नव्या नियमांनुसार, आता एका ग्राहकाला महिन्यात जास्तीत जास्त २ घरगुती LPG सिलिंडर बुक करता येणार आहेत. तसेच दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न केल्यास बुकिंग थेट नाकारले जाणार आहे.
याशिवाय, एका आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) १५ सिलिंडरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामुळे सर्व ग्राहकांना समान आणि नियमित गॅस पुरवठा मिळावा, हा सरकारचा उद्देश आहे.
दरम्यान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जर एखाद्या ग्राहकाचा वार्षिक कोटा पूर्ण झाला आणि अतिरिक्त सिलिंडरची गरज भासली, तर ‘Hello BPCL’ मोबाईल ॲपद्वारे विशेष पडताळणी करावी लागणार आहे. कुटुंबातील सदस्यसंख्या किंवा विशेष कारणे नमूद केल्यानंतरच अतिरिक्त सिलिंडर मिळणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार, सध्या देशाकडे सुमारे ६० दिवसांचा गॅस साठा उपलब्ध आहे. तसेच ४० हून अधिक देशांकडून गॅस पुरवठा सुरू होणार असल्याने परिस्थिती लवकरच सुरळीत होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमातूनच गॅस बुकिंग करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







Leave a Comment