Ads

कर्जबाजारीपणाचा बळी! दनोरीतील शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या;

By Nilesh Sir

March 20, 2026 8:08 am

Ads

अकोट तालुक्यातील दनोरी गावातील शेतकरी नागोराव रामकृष्ण खराटे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा शेतकरी समस्येचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

माहितीनुसार, नागोराव खराटे यांनी दिनांक ६ मार्च रोजी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १६ मार्च रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत नागोराव खराटे यांच्या नावे धामणा शिवारात सुमारे १.४५ हेक्टर शेती असून सेवा सहकारी संस्थेकडून कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. वाढते कर्ज, आर्थिक अडचणी आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा आप्त परिवार असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, शेतकरी आत्महत्यांच्या घटना थांबवण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असताना अशा घटना सातत्याने घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!