पातूर तालुक्यातील सिंचन विहिरींच्या कामात मोठा अनियमिततेचा घोळ उघड झाला असून, विहिरींचे बांधकाम पूर्ण करूनही शेतकऱ्यांची देयके थकवण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन छेडले. आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट जाब विचारला.
माहितीनुसार, तालुक्यातील तब्बल २ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि दागिने गहाण ठेवून सिंचन विहिरी बांधल्या, मात्र संबंधित यंत्रणेने जिओ-टॅगिंग व मस्टर नोंदी वेळेत न केल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. ३१ मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास या निधीवर गंडांतर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी विहिरींच्या देयकांऐवजी इतर कामांवर निधी वळविल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बैठकीदरम्यान गटविकास अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढला.
आमदार नितीन देशमुख यांनी प्रशासनावर हल्लाबोल करत, “तीन वर्षांपासून शेतकरी वाट पाहत आहेत, तरीही पैसे नाहीत. या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे,” असा गंभीर आरोप केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी या प्रकरणाची दखल घेत २५ मार्चपर्यंत सर्व २१०० विहिरींचे मस्टर व जिओ-टॅगिंग पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, रोज अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे सिंचन योजनेतील संभाव्य भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला असून, आता प्रशासन प्रत्यक्षात किती कठोर कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment