Ads

-

CCI कापूस खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ | १५ मार्चपर्यंत हमीभाव कायम | शेतकऱ्यांना मोठा दिलासा

By Nilesh Sir

February 28, 2026 3:18 am

Ads

सीसीआय अर्थात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अखेर राज्यातील कापूस उत्पादकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हमीभावाने कापूस खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता महाराष्ट्रात १५ मार्चपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यापूर्वी सीसीआयने २७ फेब्रुवारीपासून हमीभावाने कापूस खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढीची मागणी जोर धरत होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांना पत्र लिहून ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

२७ फेब्रुवारी सायंकाळपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याने बाजारात विविध चर्चा सुरू होत्या. अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. काही भागांमध्ये सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कापूस शिल्लक असल्याचे शेतकरी सांगत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त होत होती.

दरम्यान, सीसीआयचे अध्यक्ष ललितकुमार गुप्ता यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांच्या मागणीचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांनी खरेदीला मुदतवाढ मंजूर केली आहे.

आता कापूस उत्पादकांनी वेळ न दवडता आपला स्लॉट बुक करून हमीभावाने कापूस विकावा, असे आवाहन सीसीआयच्या वतीने करण्यात आले आहे. या निर्णयामुळे राज्यातील कापूस बाजारात स्थैर्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!