Ads

--

राज्याच्या ‘मिनी विधानसभे’चा थरार आज उघडणार? निवडणूक आयोग सज्ज!

By Nilesh Sir

January 13, 2026 12:51 pm

Ads

महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाला दिशा देणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा कोणत्याही क्षणी उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता असून, यामध्ये आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असलेल्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १५ दिवसांचा अतिरिक्त कालावधी दिल्यानंतर निवडणूक आयोग हालचालीत आला आहे. अद्याप आयोगाकडून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी आजची पत्रकार परिषद अत्यंत निर्णायक मानली जात आहे.

१२ जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार?

निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच
पुणे, सोलापूरसह राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये तत्काळ आचारसंहिता लागू होणार आहे.
या टप्प्यात ज्या जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहे, तेथेच निवडणुका घेण्यात येणार आहेत.

कोणते १२ जिल्हे?

आज घोषणा होण्याची शक्यता असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये
लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे.
या १२ जिल्हा परिषदांसह १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

उर्वरित जिल्ह्यांचे काय?

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निवडणुकांचे भवितव्य पुढील न्यायालयीन आणि प्रशासकीय निर्णयांवर अवलंबून असणार आहे.

आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि ग्रामीण भागातील नेते यांचे लक्ष लागले आहे.
आजच ‘मिनी विधानसभेचा’ बिगुल वाजतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!