रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सवासारखे सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा आणखी एक घाव बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता साखरेच्या दरवाढीने गोडधोड करण्याचा आनंदच महाग केला आहे.
वाशिमच्या घाऊक बाजारात साखरेचे दर तब्बल 5,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून अनेक ठिकाणी साखर 54 ते 55 प्रति किलो दराने विकली जात आहे. सणासुदीत घराघरांत लाडू, करंजी, मोदक, शिरा आणि इतर गोड पदार्थांची लगबग सुरू असते. मात्र यंदा वाढलेल्या साखरेच्या दरामुळे गृहिणींचे बजेट पूर्णपणे विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.
महागाईचा फटका केवळ ग्राहकांनाच नव्हे, तर मिठाई व्यावसायिक, हॉटेल चालक आणि किरकोळ व्यापाऱ्यांनाही बसत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने मिठाईचे दर वाढविण्याची वेळ येण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी सणांचा गोडवा महागाईच्या सावटाखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकीकडे इंधन दरवाढ, वाढते वाहतूक खर्च आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यात आता साखरेच्या दरवाढीने आणखी एक आर्थिक भार त्यांच्या खांद्यावर पडला आहे. सणांच्या आनंदावर महागाईचे ग्रहण लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
आता प्रश्न असा आहे की, सणांचा गोडवा टिकणार की महागाईची कडू चवच नागरिकांच्या वाट्याला येणार? शासनाने दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांमधून पुढे येत आहे.






Leave a Comment