बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार खलनायक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात असून चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रदीप रावत यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामा ही भूमिका साकारून केली. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार प्रवेश करत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.
राज बब्बर यांच्या ‘ऐतबार’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे अग्निपथ, पत्थर के फूल, संगदिल सनम, कोयला, सरफरोश, लगान अशा अनेक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली.
मात्र, 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेमुळे त्यांना देशभर मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या प्रभावी अभिनयाचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले होते. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक मानली जाते.
प्रदीप रावत यांनी केवळ हिंदी चित्रपटांमध्येच नव्हे, तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतही अनेक संस्मरणीय भूमिका साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी आणि दमदार कलाकार गमावला आहे.







Leave a Comment