Ads

कांदा नेला… पैसे नाही!” २५ क्विंटल कांदा घेऊन व्यापारी फरार;

By Nilesh Sir

May 13, 2026 9:06 pm

Ads

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात एका महिला शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिंचोली गणू येथील महिला शेतकरी सौ. अनिता पारवे यांचा तब्बल २५ क्विंटल कांदा घेऊन व्यापारी पसार झाल्याची तक्रार बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाह नावाच्या कांदा व्यापाऱ्याने दिनांक ९ मे रोजी प्रति क्विंटल ५०० रुपये दराने कांदा खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार महिला मजूर बोलावून कांदा भरून घेण्यात आला. एकूण २५ क्विंटल कांद्याची किंमत १२ हजार ५०० रुपये झाली. याशिवाय कांदा भरणाऱ्या महिला मजुरांची मजुरी ४ हजार रुपये अशी एकूण १६ हजार ५०० रुपये देणे बाकी होते.

कांदा भरून झाल्यानंतर व्यापाऱ्याने “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत, सकाळी फोन-पे करतो,” असे सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशीही पैसे पाठवले नाहीत. संध्याकाळी पैसे देतो असे सांगून पुन्हा वेळ मारून नेली आणि नंतर मोबाईल बंद करून व्यापारी गायब झाला.

या प्रकरणी काही शेतकरी व्यापाऱ्याच्या शेलूबाजार येथील घरी गेले असता तो घरातून पसार झाल्याचे समोर आले. तसेच ज्या ट्रॅक्टरमधून कांदा नेण्यात आला होता, त्या चालकाकडून माहिती घेतली असता संबंधित कांदा अकोला येथील धान्य बाजारात विक्री केल्याचे उघड झाले आहे.

महिला शेतकरी अनिता पारवे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत “आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. व्यापाऱ्याने आमची फसवणूक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करून आमचे पैसे परत मिळवून द्यावेत,” अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!