घरातून हसत-खेळत बाहेर पडलेले चार जीव… पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळंच काही लिहून ठेवलं होतं… काही क्षणांत आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले आणि चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला… अमरावतीतील धातखेडा बंधाऱ्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे
अमरावती जिल्ह्यातील धातखेडा बंधाऱ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. फ्रेजरपुरा पोलीस ठाणे हद्दीतील गोडे कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या धातखेडा बंधाऱ्यात चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अमरावती शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये दोन युवक आणि दोन युवतींचा समावेश आहे. हे सर्वजण अमरावतीतील खोलापुरी गेट परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. मृतांची नावे सोनाली नरेंद्र जोशी (वय अंदाजे १६), आदित्य नरेंद्र जोशी (वय अंदाजे १२), पायल बबलू पंडीत (वय अंदाजे २१) आणि यश गजानन काकणे (वय अंदाजे १३) अशी आहेत.
मौजा धातखेडा येथील तलाव परिसरात ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले जात असून, नेमका प्रकार कसा घडला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीआरएफ टीमला तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस प्रशासन, बचाव पथक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले.
या दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याने वातावरण अधिकच भावनिक झाले आहे.
दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण काय? सुरक्षेच्या दृष्टीने तलाव परिसरात कोणती उपाययोजना होती का? याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून, घटनास्थळी पंचनामा करण्यात येत आहे.
ही घटना पुन्हा एकदा जलाशय परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नांना अधोरेखित करणारी ठरत आहे.







Leave a Comment