अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात हिवरखेड पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे गोवंश कत्तल प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मालठाणा बु. ते अडगांव बु. रोडवर पोलिसांनी लावलेल्या आकस्मिक नाकाबंदीत एका चारचाकी वाहनातून तब्बल ४० गोवंशांची कातडी जप्त करण्यात आली असून, या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ मे २०२६ रोजी पोहेकॉ प्रमोद चव्हाण व इतर पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशन परिसरात गस्त घालत असताना मालठाणा बु. ते अडगांव बु. रोडवरील अमोल ढोकणे यांच्या शेताजवळ आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली होती. याचदरम्यान सायंकाळी सुमारे ४.१० वाजताच्या सुमारास एमएच ३० एबी २४८२ क्रमांकाचे वाहन संशयास्पदरीत्या येताना दिसले.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता वाहनात गोवंश कत्तल करून विक्रीसाठी नेण्यात येणारी ४० गोवंशांची कातडी आढळून आली. याप्रकरणी आरोपी अब्दुल खॉ महेबुब खॉ (वय ५०, रा. शिवाजी नगर, अडगांव बु. ता. तेल्हारा, जि. अकोला) याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी आरोपीकडून ४० गोवंशांची कातडी, एक मोबाईल आणि चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला.
या प्रकरणी पोहेकॉ योगेश इंगळे यांच्या फिर्यादीवरून हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक २८५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ योगेश इंगळे करीत आहेत.
विशेष म्हणजे, ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हिवरखेडचे ठाणेदार गजानन राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ प्रमोद चव्हाण, योगेश इंगळे, उमेश चव्हाण आणि पोकॉ अमोल बुंदे यांनी ही कारवाई यशस्वी केली.
या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीच्या साखळीवर पोलिसांनी मोठा घाव घातल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.







Leave a Comment