बुलढाणा जिल्ह्यातील एका कुटुंबावर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. घरात मुलाच्या लग्नाची तयारी, पाहुण्यांची लगबग आणि आनंदाचे वातावरण असतानाच एका भीषण अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मुलाचे आज लग्न आणि मुलीचा विवाह उद्या पार पडणार असताना वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने लग्नघर क्षणात शोकसभेत बदलले.
ही हृदयद्रावक घटना आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास खामगाव ते नांदुरा मार्गावरील कोलासर फाट्याजवळ घडली. पंढरी त्र्यंबक बगाडे असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर दुचाकीची जोरदार धडक बसल्याने पंढरी बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.
विशेष म्हणजे, आज त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडणार होता, तर उद्या मुलीचे लग्न आयोजित करण्यात आले होते. घरात काही तासांपूर्वीपर्यंत आनंदाचे वातावरण होते. नातेवाईकांची वर्दळ, लग्नाची तयारी आणि उत्साह सुरू असतानाच सकाळी आलेल्या या दुःखद बातमीने सर्वांनाच धक्का बसला.
वडिलांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले. “ज्या हातांनी मुलांच्या लग्नाची स्वप्नं उभी केली, त्याच वडिलांना आपल्या लेकरांचे लग्न पाहता आले नाही,” अशी भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
एकीकडे लग्नाच्या मंगल धून वाजणार होत्या, तर दुसरीकडे नियतीने त्या घरात दुःखाची शांतता पसरवली. या घटनेने बुलढाणा जिल्हा हळहळला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.







Leave a Comment