तेल्हारा तालुक्यातील वाडी अडमपूर ते जाफ्रापूर मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मंगळवार, 21 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.
मृत व्यक्तीचे नाव रमेश महादेव गुरव (रा. कालखेड, ता. शेगाव, जि. बुलढाणा) असे असून, हरिभाऊ बापूंना पुंडे (रा. पातुर्डा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर तेल्हारा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिभाऊ पुंडे आणि त्यांचे जावई रमेश गुरव हे दुचाकीने प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत रुग्णवाहिकेद्वारे दोघांनाही तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती रमेश गुरव यांना मृत घोषित केले. तर जखमी हरिभाऊ पुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “या रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
सततच्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अपघात रोखावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







Leave a Comment