महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने तब्बल १५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देत आधुनिक ‘प्रवासी निवासी मार्ग निवारे’ उभारण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
या निर्णयामुळे ‘लालपरी’ म्हणजेच एसटी बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळणार असून प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. विशेष म्हणजे हे निवारे केवळ साधे थांबे नसून ‘मिनी बस स्थानक’च्या धर्तीवर विकसित केले जाणार आहेत.
शासनाच्या आराखड्यानुसार, मुख्य मार्गांसह ग्रामीण भागातील वर्दळीच्या ठिकाणी आधुनिक आणि मजबूत रचनेचे निवारे उभारले जातील. लोखंडी किंवा काँक्रीटच्या वापरातून तयार होणारी ही निवारे आकर्षक आणि टिकाऊ असतील. यामध्ये बसण्याची सोय, छताखाली सुरक्षितता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
१५ कोटी रुपयांचा निधी चारही विभागांमध्ये त्यांच्या गरजेनुसार वाटप केला जाणार असून, या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा एमएसआरटीसीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामार्फत निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अधिकृत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल.
या उपक्रमामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटी प्रवासाचा अनुभव अधिक आधुनिक आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







Leave a Comment