Ads

--

कापूस दर ९ हजारांच्या उंबरठ्यावर… पण शेतकऱ्यांचे हात मात्र रिकामेच…तेजीचा फायदा कोणाला!?

By Nilesh Sir

April 3, 2026 3:02 pm

Ads

राज्यातील कापूस बाजारात सध्या तेजीचे वातावरण निर्माण झाले असून दर तब्बल ९ हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीत कापसाला प्रति क्विंटल ८,९०० रुपयांपर्यंत दर मिळत असून, १ एप्रिल रोजी ८,८४० रुपयांचा दर नोंदवण्यात आला आहे. किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) जास्त दर मिळत असल्याने ही बाब वरवर पाहता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

मात्र या तेजीमागील वास्तव वेगळेच चित्र दाखवते. अकोट बाजार समितीत सध्या कापसाची आवक कमी असून मागणी वाढल्यामुळे दर सातत्याने वाढत आहेत. व्यापाऱ्यांमध्ये कापूस खरेदीसाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे बाजारात तेजी कायम आहे आणि येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

परंतु, याच ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे या वाढलेल्या दरांचा फायदा नेमका कोणाला होतो आहे? कारण बहुतांश शेतकऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच कमी दरात आपला कापूस विकून टाकला आहे. आर्थिक अडचणी, कर्जफेडीची गरज आणि साठवणुकीची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना त्यावेळी कमी भावात कापूस विकावा लागला.

आज जेव्हा बाजारात तेजी आली आहे, तेव्हा अनेक शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कापूसच शिल्लक नाही. परिणामी, वाढलेल्या दरांचा थेट फायदा व्यापारी आणि साठेबाज यांच्याकडे जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ही परिस्थिती शेती व्यवस्थेतील मोठ्या विसंगतीकडे लक्ष वेधणारी आहे. एका बाजूला दर वाढले असले तरी, शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य दर मिळत नसल्याने त्यांचा फायदा होत नाही. उलट बाजारातील चढ-उताराचा लाभ मध्यस्थांकडे जातो, ही वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

कापूस साठवणूक सुविधा, आर्थिक मदत आणि बाजारपेठेतील पारदर्शकता वाढवली तरच शेतकऱ्यांना अशा तेजीचा खरा फायदा मिळू शकतो. अन्यथा दर वाढले तरी शेतकरी मात्र कायम तोट्यातच राहणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

एकंदरीत, कापसाच्या दरातील ही तेजी सकारात्मक असली तरी शेतकऱ्यांच्या हातात रिकामीच पिशवी राहिल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!