शासनाच्या घरकुल योजनांचा गाजावाजा होत असताना प्रत्यक्षात मात्र गरजू लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव बाळापूर तालुक्यातील टाकळी खोजबोळ येथे समोर आले आहे. घरकुलाचा लाभ न मिळाल्याने एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली असून प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, रामचंद्र गजानन नावकार यांचे नाव सन २०१८-१९ च्या रमाई घरकुल योजनेत असूनही आजपर्यंत त्यांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे हतबल झालेल्या रामचंद्र नावकार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
याच कुटुंबातील गजानन बालुजी नावकार यांचे नाव प्रधानमंत्री घरकुल योजनेत असूनही त्यांनाही लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे, या अन्यायामुळे त्यांच्या आई शिधुबाई नावकार यांना मानसिक धक्का बसून हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
“सरकार म्हणते कोणीही बेघर राहणार नाही, मग आम्हाला घरकुल का नाही?” असा संतप्त सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. जातीय राजकारण आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, “लवकरात लवकर घरकुलाचा लाभ न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा” रामचंद्र नावकार यांनी दिला असून या घटनेमुळे प्रशासनाची झोप उडणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







Leave a Comment