अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा वाढता सुळसुळाट पुन्हा एकदा समोर आला आहे. एका दिवसात दोन वेगवेगळ्या ठिकाणी उघड झालेल्या घटनांनी प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. कत्तलीसाठी बाहेर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवारी सकाळी पातूर पोलीस स्टेशन हद्दीतील नांदखेड फाट्याजवळ टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाचा (MH 30 BD 5207) अपघात झाला. भरधाव वेगाने गोवंश वाहतूक करताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेत एका गोवंशाचा मृत्यू झाला, तर चार ते पाच गोवंश जखमी झाले. जखमी जनावरांना तातडीने ‘आदर्श गोरक्षण संस्था’ येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातानंतर चालक व त्याचे साथीदार फरार झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, याच दिवशी रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीत गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकत चार ते पाच गोवंशांची सुटका केली. या कारवाईमुळे तस्करांचे जाळे किती सक्रिय आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले.
यापूर्वीही बोरगाव मंजू परिसरात अशाच अपघातात दोन गोवंशांचा मृत्यू झाला होता. सततच्या घटनांमुळे गोवंश तस्करी अजूनही थांबलेली नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
गोवंशांना अमानुष पद्धतीने कोंबून, भरधाव वेगाने वाहतूक केल्याने अपघातांची शक्यता वाढत आहे. त्यामुळे नागरिक आणि गोवंश प्रेमींनी कडक कारवाईची मागणी केली आहे. आता पोलिस प्रशासन या बेकायदेशीर साखळीवर प्रभावी आळा घालणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







Leave a Comment