अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार महसूल मंडळ परिसरात शेकडो वीटभट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात बिनपरवाना माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. वीटभट्ट्यांसाठी लागणारी माती मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून ट्रक आणि टिप्परद्वारे बाहेर नेली जात आहे. या अवैध उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
नियमांनुसार वीटभट्ट्यांसाठी माती उत्खनन करण्यापूर्वी तहसील कार्यालयात रॉयल्टी भरून परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात ही परवानगी केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी एका रॉयल्टी तपासणी अधिकाऱ्याच्या संगनमताने दिवसाला तीन ते चार टिप्पर माती बिनधास्त सोडली जात असल्याचे आरोप होत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असून सरकारचा लाखो रुपयांचा महसूल थेट बुडीत जात आहे.
दरम्यान, महसूल प्रशासनाने एखादा माती वाहतूक करणारा ट्रक पकडून मोठा गाजावाजा केला असला तरी प्रत्यक्षात अवैध उत्खननावर ठोस कारवाई झालेली दिसत नाही. या सर्व प्रकाराकडे तहसीलदार आणि मंडलाधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वीटभट्ट्या असोत किंवा नदीपात्रातील बेकायदा वाळू उपसा – याची इत्यंभूत माहिती स्थानिक तलाठी आणि संबंधित यंत्रणेला असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र कारवाई होत नसल्याने “सगळे काही संगनमतानेच सुरू आहे का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशी करून अवैध माती उत्खनन करणाऱ्यांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा चोहोट्टा बाजार परिसरात माती माफियांचे साम्राज्य अधिकच बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे.









