जुन्या वादातून रक्तरंजित हल्ला; गंभीर जखमी लखन अंभोरेचा उपचारादरम्यान मृत्यू

अकोट शहरातील राजेंद्रनगर परिसरात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत ६ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास जुन्या वादातून राजेंद्रनगर, खानापुर वेस अकोट येथील लखन अंभोरे यांच्यावर लोखंडी पाईप, चाकू, दगड आणि विटांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात लखन अंभोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १० मार्च रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी सौ. दुर्गा लखन अंभोरे (वय ३२, रा. राजेंद्रनगर, खानापुर वेस, अकोट) यांनी अकोट शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात राम पांडुरंग अंभोरे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील आणि अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवत या गुन्ह्यातील ६ आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अकोट शहर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि सहायक पोलीस अधीक्षक निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे तसेच डीबी पथकाने केली आहे.

Leave a Comment