महामार्गालगत बिनधास्त वीट भट्टे; महसूल विभाग झोपेत की मेहरबानीत?

अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार परिसरात मुख्य महामार्गाच्या अगदी शेजारी बिनपरवाना वीट भट्टे सुरू असताना महसूल विभाग मात्र डोळेझाक करत असल्याचे संतप्त चित्र समोर आले आहे. प्रशासनाने कारवाई केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असल्याने ही कारवाई केवळ कागदोपत्रीच राहिल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

महामार्गालगत मोठ्या प्रमाणात राखाड, माती आणि वीट भट्ट्यांचे साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाने येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. तरीही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वी तहसीलदार स्वतः घटनास्थळी हजर राहून महसूल विभागाने कारवाई केल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतरही वीट भट्टे बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ दिखाऊ होती का, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात काही प्रकारचे ‘सेटलमेंट’ झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे महसूल मंडळातील कोणता अधिकारी या बेकायदेशीर वीट भट्ट्यांवर मेहरबान आहे, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

महामार्गालगत नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या वीट भट्ट्यांमुळे मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment