अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात किराणा दुकाने आणि सेतू केंद्रांवर गॅस सिलेंडरची विक्री सुरू असताना प्रशासन मात्र कानाडोळा करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. जीवघेण्या ठरू शकणाऱ्या गॅस सिलेंडरचा साठा नियम धाब्यावर बसवून ठेवला जात असतानाही संबंधित विभाग झोपेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण भागातील अनेक किराणा दुकाने तसेच सेतू केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या ठिकाणी फायर सेफ्टीची कोणतीही उपाययोजना नाही, अग्निशामक यंत्र नाही, तसेच सुरक्षा नियमांचे पालनही होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा धोकादायक परिस्थितीत एखादी आग किंवा स्फोटाची घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याशिवाय ज्या दुकानदारांकडे गॅस सिलेंडरचा साठा ठेवण्यात आला आहे त्यांना अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे का, हा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारण गॅससारख्या ज्वलनशील वस्तूंची साठवणूक करताना कडक नियमांचे पालन करणे आवश्यक असते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकाराकडे पुरवठा विभाग आणि संबंधित प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा होत असताना प्रशासनाला याची माहिती नाही का, की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.
एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे तातडीने या प्रकाराची चौकशी करून नियमबाह्य साठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.









