हिंदू धर्मात चंद्रग्रहणाला विशेष धार्मिक महत्त्व दिले जाते. पंचांगानुसार ३ मार्च २०२६ रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. भारतात चंद्रोदय सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी होईल. त्यामुळे ग्रहणाचा मोठा भाग भारतात दिसणार नाही. भारतीय नागरिकांना फक्त शेवटचा टप्पा, म्हणजेच सूर्यास्तानंतरचा अंतिम भाग, काही काळ पाहता येण्याची शक्यता आहे.
बहुतेक ठिकाणी चंद्र सायंकाळी ६:१० ते ६:२० दरम्यान उगवतो. त्यामुळे पूर्व भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ग्रहणाचा शेवटचा भाग अधिक स्पष्ट दिसू शकतो. आकाश निरभ्र असल्यास हा नजारा पाहण्याची संधी मिळेल.
चंद्रग्रहणात काय करावे?
धार्मिक मान्यतेनुसार ग्रहणकाळात मंत्रजप, स्तोत्रपठण आणि ध्यान केल्यास त्याचे पुण्यफळ अनेक पटींनी वाढते असे मानले जाते. या काळात श्रीविष्णू मंत्र, चंद्र मंत्र तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.
ग्रहणाच्या वेळी अन्न व पिण्याच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावीत अशी परंपरा आहे. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घरात गंगाजल शिंपडणेही अनेक जण पाळतात. तसेच ग्रहणानंतर गरीब व गरजू लोकांना अन्नदान केल्यास पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे.
चंद्रग्रहणात काय करू नये?
परंपरेनुसार ग्रहणकाळात देवी-देवतांची नियमित पूजा करणे टाळावे आणि मूर्तीला स्पर्श करू नये असे सांगितले जाते. या काळात अन्न ग्रहण करू नये, नवीन वस्तू खरेदी करू नयेत आणि कोणतेही शुभ कार्य करू नये, अशी समजूत आहे. धारदार वस्तूंचा वापर टाळावा असेही मानले जाते. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी आणि अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, अशी धार्मिक सूचना दिली जाते.
श्रद्धा आणि विज्ञान
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना असून पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये आल्यामुळे चंद्रावर पृथ्वीची सावली पडते. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा समतोल राखत ही घटना पाहणे महत्त्वाचे आहे.
३ मार्च २०२६ रोजीचे हे पहिले चंद्रग्रहण भारतात पूर्णपणे दिसणार नसले तरी सायंकाळी काही वेळासाठी त्याचा शेवटचा टप्पा पाहण्याची संधी नागरिकांना मिळू शकते.







Leave a Comment