अकोट तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाची मानली जाणारी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत रस्ता योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक शेतरस्त्यांचा निधी अचानक रद्द करून तो दुसऱ्या तालुक्यात वळविण्यात आल्याचा आरोप पुढे आला असून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामीण शेतीमाल वाहतूक, रुग्णवाहिका सुविधा तसेच दैनंदिन हालचालीसाठी अत्यावश्यक असलेल्या या रस्त्यांचे काम थांबवल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विकासाऐवजी अडथळे निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

रद्द करण्यात आलेले प्रमुख शेतरस्ते
माहितीनुसार, अकोट तालुक्यातील विविध गावांमधील मंजूर रस्ते रद्द करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने —
रेल येथील सुनील हाते यांच्या शेतापासून डॉ. राठोड यांच्या शेतापर्यंतचा खडीकरण रस्ता
रेल येथील वसंत मेहसरे यांच्या शेतीपासून जनार्दन ढोरे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता
पनोरी येथील गोपाल बुटे ते शिवदास बुटे शेतरस्ता
दनोरी येथील सचिन वानखडे ते तिरंदास इंगळे शेतरस्ता खडीकरण
हे सर्व रस्ते स्थानिक शेती वाहतुकीसाठी तसेच गावांमधील संपर्क वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते.
आरोग्य सेवांवरही परिणाम होण्याची भीती
पनोरी–दनोरी मार्गावरील रस्ता हा नागरिकांसाठी जीवनदायी ठरणार होता. या मार्गामुळे कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे सोपे झाले असते.
स्थानिकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये रस्ता नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला पावसाळ्यात बैलगाडीत टाकून उपचारासाठी कावसा येथे नेण्याची वेळ आली होती. त्यामुळे हा रस्ता आरोग्यदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. निधी रद्द झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
शेतकरी वर्गात संताप, चौकशीची मागणी
शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंजूर कामे अचानक रद्द करून निधी दुसरीकडे वळविण्यामागील कारणे जाहीर करावीत, तसेच रद्द करण्यात आलेले सर्व शेतरस्ते तातडीने पुन्हा मंजूर करावेत, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण विकासासाठी महत्त्वाच्या योजनेत अशा प्रकारे निधी वळविणे म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय असल्याचा आरोपही होत आहे.









