आज भारत बंद… पण सगळंच बंद नाही! जाणून घ्या काय सुरू, काय ठप्प

केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी धोरणांविरोधात आज, १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला असून मुंबईत वांद्रे येथील कामगार आयुक्त कार्यालयावर दुपारी तीन वाजता निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.


महाराष्ट्रात कामगार, कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली इंटक, आयटक, एचएमएस, सीटीयू, एनटीयूआय, भारतीय कामगार सेना, एआयसीसीटीयू, एआयबीईए, बीईएफआय, एआयआयईए, राज्य सरकारी कर्मचारी महासंघ, श्रमिक एकता मंच, कामगार एकता, स्वतंत्र फेडरेशन आदी २० हून अधिक संघटना एकवटल्या आहेत.


संघटनांच्या आरोपानुसार, केंद्र सरकार कामगार व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कठोर भूमिका घेत असून सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३ पेक्षा अधिक गिरण्या गेली पाच वर्षे बंद आहेत. त्यामुळे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच २९ जुने कामगार कायदे रद्द करून चार नवीन कामगार संहितांची अंमलबजावणी केल्याने कामगार वर्ग अडचणीत आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीही कामगार हिताचे कायदे रद्द करून कामगारांचे भविष्य धोक्यात आणल्याचा आरोप केला आहे.


आंदोलनात सहभागी होणारे घटक
बँक कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, परिचारिका, फेरीवाले, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, बस-रिक्षा-टॅक्सी चालक, असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संयुक्त कृती समितीने दिली आहे. आंदोलन शांततेत पार पडेल, असेही स्पष्ट करण्यात आले.


🔒 काय बंद राहणार?
सार्वजनिक वाहतूक
बँकिंग व विमा सेवा
सरकारी कार्यालये
बाजारपेठा व दुकाने
शाळा व महाविद्यालये


🟢 काय सुरू राहणार?
रुग्णालये व आरोग्य सेवा
औषधांची दुकाने
रुग्णवाहिका सेवा
दूध व भाजीपाला पुरवठा
अग्निशमन सेवा
वीज व पाणीपुरवठा

Leave a Comment