सातपुड्याच्या पायथ्याशी गाय ठार… शेतात मृत्यूची झडप! गावात दहशत

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसित कुंड गावात दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंड गावाजवळील शेत परिसरात चरत असलेल्या गायीवर अचानक वन्यप्राण्याने झडप घातली. काही क्षणांतच गायीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संबंधित वन्यप्राणी जंगलाच्या दिशेने पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

परिसरात यापूर्वीही वन्यप्राण्यांचा वावर दिसून आला असून, तरीही प्रतिबंधात्मक उपाय न केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

सातपुडा परिसरात शेती वस्ती जंगलालगत असल्याने जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून तात्काळ नुकसानभरपाई, संरक्षणात्मक कुंपण आणि नियमित गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर कुंडसह आसपासच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Comment