अकोला जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या प्राणघातक हत्येनंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्येमागे स्थानिक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप थेट कुटुंबीयांनी केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
हिदायत पटेल यांच्या कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, या हत्येप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बदरुज्जामा, तसेच काँग्रेसचे पदाधिकारी राजू बोचे, संजय बोडखे, फाजिल खान आणि फारूक खान यांची नावे संशयित म्हणून समोर आली आहेत. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी हिदायत पटेल यांनी स्वतः ही नावे सांगितली होती, असा दावा त्यांच्या पुतण्याने केला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या गंभीर आरोपांची तात्काळ दखल घेत काँग्रेस पक्षाने संजय बोडखे आणि राजू बोचे यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षांनी अधिकृत पत्राद्वारे ही कारवाई जाहीर करत, संबंधित दोघांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पक्षशिस्तीच्या दृष्टीने ही कठोर पावले उचलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या हत्याकांडामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि राजकीय परिणामांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









