अनुदान मागणं गुन्हा ठरलं का?शासनाच्या योजनेचा हक्क विचारताच शेतकऱ्याच्या अंगावर धावून बुटाने मारहाण करण्यापर्यंत प्रशासन पोहोचलं असून, वाशिममधील हा प्रकार सत्तेच्या माजाची धक्कादायक झलक दाखवतो.
गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन वर्षांपूर्वी मनरेगा योजनेंतर्गत संत्रा फळबाग विकसित केली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान गेल्या चार महिन्यांपासून रखडले असून, याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी आले असता, पवार यांनी आपल्या रखडलेल्या अनुदानाबाबत शांतपणे विचारणा केली. मात्र, चर्चेऐवजी संबंधित अधिकाऱ्याने आपला संयम गमावत थेट शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत बुटाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतकेच नव्हे, तर शेतातील मातीची ढेकळे उचलून मारल्याचाही प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेत अधिकाऱ्याने शेतकऱ्याला “तुला गुन्ह्यात अडकवीन” अशी धमकी दिल्याचा आरोप असून, प्रशासनातील अरेरावी पुन्हा एकदा उघड झाली आहे. हा प्रकार केवळ एका शेतकऱ्यावर नव्हे, तर संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
एकीकडे निसर्गाचे संकट, दुसरीकडे आर्थिक अडचणी आणि त्यातच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची दादागिरी — अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी न्यायासाठी कुठे जायचे? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.









