अकोट तालुक्यात मंगळवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. कडकडणाऱ्या विजा, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे काही काळासाठी जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, या पावसापेक्षा अधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे संपूर्ण तालुक्यात खंडित झालेला वीजपुरवठा.
पावसाळ्यापूर्वी देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याचा दावा करणाऱ्या महावितरणच्या व्यवस्थेवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण, मुसळधार पावसात अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आणि अनेक नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती कामे, दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याचे नागरिकांनी सांगितले. अनेकांनी महावितरणच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची नाराजी व्यक्त केली.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी, वीजवाहिन्यांची तपासणी, उपकेंद्रांची देखभाल आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचा दावा केला जातो. मात्र, पहिल्याच जोरदार पावसात वीजपुरवठा कोलमडल्याने या कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पावसाळा अजून सुरुवातीच्या टप्प्यात असताना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत मुसळधार पावसाच्या काळात नागरिकांना आणखी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार का, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय, किती भाग प्रभावित झाले आणि पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागणार, याबाबत महावितरणकडून अधिकृत माहिती देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामान्य नागरिकांचा प्रश्न एकच… जर पहिल्याच मुसळधार पावसात अकोट तालुका अंधारात जात असेल, तर उर्वरित पावसाळ्यात परिस्थिती नेमकी कशी असणार?






Leave a Comment