बारावी बोर्ड परीक्षांना उद्यापासून सुरुवात; कॉपी रोखण्यासाठी ड्रोन-CCTV नजर, कडक पोलिस बंदोबस्त

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या बोर्ड परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात होत आहे. परीक्षा कोणताही तणाव, गोंधळ किंवा गैरप्रकार न होता सुरळीत पार पडाव्यात यासाठी राज्य प्रशासनाने यंदा व्यापक आणि कठोर नियोजन केले आहे.


ड्रोन व CCTV द्वारे परीक्षा केंद्रांवर नजर

पेपरफुटी, कॉपी किंवा बाह्य हस्तक्षेप रोखण्यासाठी परीक्षा काळात केंद्र परिसरात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संवेदनशील व उपद्रवी म्हणून ओळख असलेल्या परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
अशा ठिकाणी CCTV चित्रिकरणासह ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सतत नजर ठेवली जाणार असून, संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे.


प्रश्नपत्रिका वाहतूक पोलिस बंदोबस्तात
प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचाव्यात आणि उत्तरपत्रिका संकलन सुरळीत व्हावे यासाठी शासकीय वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.


भरारी व बैठी पथकांची नियुक्ती
परीक्षा केंद्रांवर अचानक तपासणीसाठी भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक भरारी पथकात किमान एक महिला प्रतिनिधी असणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
ही पथके कॉपी, गैरप्रकार किंवा नियमभंगाच्या तक्रारींवर तात्काळ छापे टाकणार आहेत.


गैरप्रकारांवर अजामीनपात्र गुन्हे
परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रतिबंधक गैरप्रकार कायदा 1982 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. या कायद्यानुसार दोषींविरोधात दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल होऊ शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता प्रामाणिकपणे परीक्षा द्याव्यात, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Leave a Comment