श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कावड-पालखी मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी अकोला-अकोट राज्य महामार्ग, अकोला-दर्यापूर तसेच मुर्तिजापूर-दर्यापूर मार्गावरील वाहतूक ठराविक कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केले आहेत.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तसेच 7 सप्टेंबर 2026 रोजी शेवटच्या सोमवारी अकोला शहरात कावड व पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुकीत अंदाजे 40 ते 50 पालख्या, 150 ते 175 कावड आणि 25 ते 30 हजार शिवभक्तांचा सहभाग अपेक्षित आहे.
विशेषतः 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून जल घेऊन कावडीसह अकोला शहरातील श्री राजराजेश्वर मंदिराकडे पायदळ मार्गक्रमण करणार आहेत.
अकोला-अकोट मार्गावरील वाहतूक वळविणार
अकोला-अकोट राज्य महामार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असून या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे कावडधारी भाविक आणि वाहनांची वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी अकोला ते अकोट तसेच अकोट ते अकोला जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : अकोला बसस्थानक – पोस्ट ऑफिस चौक – अशोक वाटिका चौक – जेल चौक – पत्रकार चौक – वाशिम बायपास – शेगाव टी पॉईंट – गायगाव – निंबा फाटा – देवरी – अकोट.
अकोला-दर्यापूर मार्गावरही बदल
अकोला बसस्थानक – रेल्वे स्टेशन चौक – आपातापा चौक – म्हैसांग मार्गे दर्यापूर जाणारी तसेच दर्यापूरहून अकोला येणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : अकोला बसस्थानक – अग्रसेन चौक – दुर्गा चौक – जठारपेठ चौक – लहान उमरी – मोठी उमरी – गुडधी – रेल्वे गेट – आदिलाबाद मार्गे घुसर – म्हैसांग – दर्यापूर.
अकोला शहरातील मिरवणूक मार्गावर वाहतुकीत बदल
कावड-पालखी मिरवणुकीच्या मार्गावरही वाहनांना प्रवेश न देता विविध पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रेल्वे स्टेशन चौक, अकोट स्टॅण्ड, बियाणी चौक, कोतवाली चौक, लक्झरी बस स्टॅण्ड, वाशिम बायपास, गांधी चौक, जयहिंद चौक, डाबकी रोड, पोळा चौक, हरिहरपेठ आदी भागांतील वाहतूक आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
रेल्वे स्टेशन चौकातून येणारी वाहतूक पुलावरून जेल चौक, बायपास, अग्रसेन चौक, नवीन उड्डाणपूल, लक्झरी बस स्टॅण्ड आणि वाशिम बायपासच्या दिशेने वळविण्यात येईल.
डाबकी रोड, जुने शहर परिसरातून येणारी वाहतूक भांडपुरा चौक, पोळा चौक, किल्ला चौक, हरिहरपेठ आणि वाशिम बायपासमार्गे वळविण्यात येणार आहे.
कोणत्या दिवशी आणि किती वाजता वाहतूक बंद?
- 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 – अकोला-अकोट व संबंधित मार्गावरील वाहतूक 16 ऑगस्ट दुपारी 2 ते 17 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत.
- 23 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2026 – 23 ऑगस्ट दुपारी 2 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत.
- 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 – 30 ऑगस्ट दुपारी 2 ते 31 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत.
- 6 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2026 – 6 सप्टेंबर दुपारी 12 ते 7 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत.
अकोला शहरातील कावड-पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक संबंधित दिवशी रात्री 8 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33 (1) (ख) अन्वये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हे वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत. कावडधारी भाविकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.
नागरिकांनी संबंधित कालावधीत प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






Leave a Comment