अकोट | प्रतिनिधी:- अकोट तालुक्यातील पोपटखेड धरणाच्या जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याने शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी धरणाचे गेट उघडण्यात आले असून प्रशासनाने खारा नाला आणि पठार नदीकाठच्या तब्बल २९ गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला.
प्रशासनाने नागरिकांना नदी, नाले, ओढे आणि पूरप्रवण भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर नदीपात्रातील पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या १८ गावांना सतर्कतेचा इशारा (पठार नाला)
अकोलखेड, ताजनापूर, ढगा, धनकवाडी, करतवाडी, सावरगाव, खापरवाडी बु., खापरवाडी खुर्द, वरूड, जऊळका, लोतखेड, दिनोडा, मरोडा, देऊळगाव, कावसा, तरोडा, पनोरी आणि धामणा रेल.
या ११ गावांना सतर्कतेचा इशारा (खारा नाला)
आंबोडा, अकोट, कालवाडी, पळसोद, टाकळी खुर्द, देवर्डा, निजामपूर, लाजुरवाडी, आगसखेड, सालखेड आणि टाकळी बु.
प्रशासनाचे आवाहन
धरणाखालील भागातील नदी-नाल्यांमध्ये पाणीपातळी आणखी वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये, नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून, आवश्यकतेनुसार पुढील सूचना जारी करण्यात येणार आहेत. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून कोणतीही जोखीम घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.







Leave a Comment