श्रावणातील दुसऱ्या सोमवारनिमित्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात रविवारी सायंकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. कावडधारी आणि भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने नदीपात्रात सुरक्षा जाळी बांधण्यात आली आहे.
श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून भाविक गांधीग्राम येथे दाखल होत आहेत. रविवारी सायंकाळपासून पूर्णा नदीपात्रात भाविकांची वर्दळ वाढल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली आहे.

नदीपात्रात भाविकांची गर्दी वाढत असताना पाण्याचा प्रवाह आणि संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुरक्षा जाळी उभारली. भाविकांनी निर्धारित सुरक्षित परिसरातच जलघेणे करावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, गर्दीच्या पार्श्वभूमीवर दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या उपस्थितीत पोलिस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी RCP बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्रावण सोमवारच्या धार्मिक उत्साहाला सुरक्षेची मजबूत साथ देण्यासाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा मैदानात उतरली असून, गांधीग्रामच्या पूर्णा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.






Leave a Comment