हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव सध्या आयुष्यातील सर्वांत कठीण टप्प्याला सामोरा जात आहे. चेक बाऊन्स प्रकरणामुळे त्याला दिल्लीतील तिहार कारागृहात आत्मसमर्पण करावे लागले असून या प्रकरणाची देशभरात चर्चा रंगली आहे.
२५ वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या राजपाल यादवने ‘छोटा पंडित’सारख्या संस्मरणीय भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र अभिनयातून दिग्दर्शनाकडे वळण्याचा त्याचा निर्णयच त्याच्यासाठी अडचणींचं कारण ठरल्याचं समोर आलं आहे.
‘अता पता लापता’ ठरला टर्निंग पॉईंट
राजपाल यादवने पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेला ‘अता पता लापता’ हा चित्रपट त्याच्यासाठी स्वप्नवत प्रोजेक्ट होता. या चित्रपटात त्याने दिग्दर्शनासोबत मुख्य भूमिकाही साकारली होती. सुमारे ११ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला.
मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अत्यंत निराशाजनक प्रतिसाद मिळाला. तब्बल ११ कोटींच्या गुंतवणुकीसमोर चित्रपटाने अवघे सुमारे ३८ लाख रुपयेच कमावले. या अपयशामुळे राजपाल यादव यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा चढला.
कर्ज, चेक बाऊन्स आणि कोर्टाची कारवाई
चित्रपटासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी राजपाल यादव यांनी काही धनादेश दिले होते. परंतु आर्थिक अडचणींमुळे हे चेक बाऊन्स झाले. प्रकरण कोर्टात पोहोचले आणि दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांना आत्मसमर्पणाचे आदेश दिले.
अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार राजपाल यादव यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले. पडद्यावर लोकांना हसवणारा अभिनेता तुरुंगात जाताना भावूक झाल्याचेही समोर आले आहे.
बॉलिवूड कलाकारांचा पाठिंबा
या कठीण काळात अनेक बॉलिवूड कलाकार त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. सोनू सूद, गुरमीत चौधरी यांसारख्या कलाकारांनी सहानुभूती व्यक्त केली आहे.
दरम्यान, राजपाल यादवच्या आत्मसमर्पणानंतर अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीलाही सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागल्याची चर्चा रंगली आहे.
दिग्दर्शकांचा सल्ला
दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महत्त्वाकांक्षा चांगली असली तरी निर्मिती-दिग्दर्शनात अनुभव आणि योग्य सल्ला नसल्यास मोठे आर्थिक धोके निर्माण होतात. अनेक कलाकारांना करार व आर्थिक कागदपत्रांची गुंतागुंत समजत नाही आणि तिथूनच अडचणी सुरू होतात.
राजपाल यादव प्रकरणाने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील आर्थिक जोखमींचा मुद्दा चर्चेत आणला आहे. पडद्यामागील संघर्ष किती कठीण असतो, याची जाणीव या घटनेतून होत आहे.
तुमचं मत काय? कलाकारांनी निर्मिती-दिग्दर्शनात उतरताना अधिक सावध असावं का? प्रतिक्रिया नक्की नोंदवा.









